ज्ञानेश्वर सांगळे, नाशिक
नाशिक:नाशिक शहराची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, राजमाता अहिल्यादेवी होळकर पूल ते रामवाडी पुलादरम्यान चक्क नदीपात्रातील पानवेलींवर झाडे उगवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाने ४ दिवसांत स्वच्छता न केल्यास येत्या रविवारी ‘मानवी साखळी’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सध्या कुंभमेळा मंत्री मा. गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प राबविला जात आहे. मात्र, नदीपात्रात साचलेल्या पानवेलींच्या थरावर आता मोठी झाडे वाढू लागली आहेत. ही परिस्थिती पाहून, “प्रशासनाचा झाडे लावण्याचा संकल्प जमिनीवरच नाही, तर आता चक्क गोदावरीच्या पाण्यावरही पूर्ण होत आहे की काय?” असा उपरोधिक सवाल नाशिककर विचारत आहेत.

राज्य शासन व नाशिक महानगरपालिकेने गोदावरी नदीच्या स्वच्छता व संवर्धनासाठी ‘क्लीन गोदा बँड’ या योजनेअंतर्गत तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात नदीपात्रातील सद्यस्थिती पाहता हा खर्च नेमका कुठे झाला, असा सवाल नागरिक व पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.

गोदावरी पात्रात साचलेले पाणवेलीचे जाळे, कचरा आणि गाळ यामुळे नदीचे सौंदर्य नष्ट होत असून पाणी दूषित होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे भविष्यात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावरील नागरिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात नियमित स्वच्छता, पाणवेली काढण्याची मोहीम किंवा यांत्रिक साफसफाई झालेली दिसत नाही.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचे आश्वासन वारंवार दिले जात असताना, सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही गोदावरीची अवस्था अशीच राहिली, तर हा खर्च निरर्थक ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या प्रकरणी नाशिक महानगरपालिका, जलसंपदा विभाग व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन पाणवेली काढणे, गाळ सफाई करणे आणि नियमित देखरेख व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा गोदावरी नदीचा प्रश्न केवळ पर्यावरणाचा न राहता, जनआंदोलनाचा मुद्दा बनेल, असा इशाराही दिला.

होळकर पूल ते रामवाडी पूल या दरम्यान नदीचे पात्र पानवेलींनी पूर्णपणे व्यापले आहे. या साचलेल्या घाणीमुळे आणि पानवेलींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रविवार २२ डिसेंबरला ‘मानवी साखळी’ आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आता नाशिकचे नागरिक एकवटले आहेत. प्रशासनाला खालीलप्रमाणे अल्टिमेटम देण्यात आला आहे.येत्या चार दिवसांत २१ डिसेंबरपर्यंत नदीपात्रातील पानवेली आणि झाडांची पूर्णपणे साफसफाई करावी.स्वच्छता न झाल्यास रविवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी ‘गोदा वॉक वे”या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला नदीकिनारी नागरिक एकत्र येऊन ‘मानवी साखळी’ तयार करतील आणि प्रशासनाचे लक्ष वेधतील.
गोदावरीच्या या दुर्दशेमुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, आता महापालिका प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





